सांगली–मिरज–कुपवाड महापालिका निवडणुकीत भाजपला उत्स्फूर्त प्रतिसाद प्रकाशमामा ढंग यांची जबाबदारी वाढली, कुपवाडमध्ये विकासाचा मुद्दा ठरतोय निर्णायक

Team IBN 7 : ( प्रतिनिधि : बंडू चौगुले ) : सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी तत्कालीन नगरसेवक प्रकाशमामा ढंग यांच्याकडे सोपवली असून, आता महापालिका निवडणुकीतही त्यांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरत आहे.
कुपवाड परिसरात प्रकाशमामा ढंग यांना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि महिलांमध्ये विशेषतः त्यांच्याबद्दल सकारात्मक भावना व्यक्त होत आहेत. अनेक नागरिक व महिलांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, स्वतःचा विचार न करता जनतेचा विचार करून प्रकाशमामा ढंग यांनी विकासकामांना प्राधान्य दिले, त्यामुळे त्यांचा आणि भाजपच्या पॅनलचा विजय निश्चित असल्याचा विश्वास मतदार व्यक्त करत आहेत.
प्रकाशमामा ढंग यांच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता या पदापर्यंत पोहोचल्याचा आनंद नागरिकांमध्ये दिसून येत आहे. लोकांची काळजी घेऊन काम करण्याची भूमिका त्यांनी सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेतून दाखवून दिली असल्याने प्रभाग क्रमांक दोनमधून त्यांना आणि त्यांच्या उमेदवारांना निवडून देणे हे आपले कर्तव्य असल्याची भावना मतदारांमध्ये निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, कुपवाडमध्ये अनेक वर्षे कोणताही ठोस विकास झाला नसताना, प्रकाशमामा ढंग यांच्या प्रयत्नातून सुमारे 270 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. या निधीतून ड्रेनेज व्यवस्था, काँक्रीट रस्ते यांसारखी महत्त्वाची विकासकामे मार्गी लागली. त्यामुळे कुपवाड परिसरात भाजपच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सन 2018 मध्ये तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ड्रेनेजचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता होत असून सध्या 80 ते 90 टक्के काम पूर्ण झाले आहे, तर उर्वरित काम लवकरच 100 टक्के पूर्णत्वाकडे जात असल्याचे दिसून येत आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने कुपवाड शहराला महापौरपदाची संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे विरोधकांमध्येही अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र आहे. एकूणच कुपवाडमध्ये विकासाच्या मुद्द्यावरून भाजप आणि प्रकाशमामा ढंग यांना स्पष्ट आघाडी मिळत असल्याचे राजकीय चित्र दिसून येत आहे.

